सिमेंटच्या रस्ते कामांत वाहतूककोंडी अडथळा; कॉंक्रीटची कामे रात्रीच्या वेळी करा; IIT ची पालिकेला सूचना

मुंबईकरांना पुरवण्यात येणाऱ्या दर्जेदार नागरी सेवा सुविधांचा एक भाग म्हणून रस्त्यांचे सिमेंट कॉँक्रीटीकरण करण्यात येत आहे.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : सिमेंट कॉँक्रीट आणि खडी वाहून आणणारी वाहने, रेडी मिक्स कॉंक्रिट प्लांट यातील अंतर, वाहतूककोंडीमुळे सिमेंट खडी मिश्रणात पाण्याचे घटणारे प्रमाण यासाठी मुंबईतील वातावरण, वाहतूककोंडी हे घटक कारणीभूत ठरतात. सिमेंट कॉँक्रीटच्या रस्ते कामांत आव्हाने येतात, असे पालिकेच्या अभियंत्यांनी आयआयटी, मुंबई समोर स्पष्ट केले. दमट वातावरण तसेच वाहतूककोंडी यासारखी आव्हाने पाहता अधिकाधिक कॉँक्रीटीकरणाची कामे ही रात्रीच्या वेळेत करण्याचे आयआयटी, मुंबईच्या प्राध्यापकांनी यावेळी सूचवले. दरम्यान, मुंबईला भविष्यात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रस्ते उपलब्ध करून देणार, असे प्रतिपादन पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी केले. पवई येथील आयआयटी, मुंबईच्या कार्यालयात आयोजित विचारमंथन कार्यशाळेत ते बोलत होते.

मुंबईकरांना पुरवण्यात येणाऱ्या दर्जेदार नागरी सेवा सुविधांचा एक भाग म्हणून रस्त्यांचे सिमेंट कॉँक्रीटीकरण करण्यात येत आहे. हे रस्ते अत्युच्च गुणवत्तेचे असणे, सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. म्हणून आयआयटी मुंबई सारख्या संस्थेकडून अभियंत्यांसोबत विचारमंथन करून, केले जाणारे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे. अशा संयुक्त कामगिरीमुळे मुंबईच्या भविष्यातील गरजांसाठी महानगरपालिका अधिक सक्षम संस्था आहे, ही भावना आणि आत्मविश्वास नागरिकांमध्ये वाढीस लागण्यासाठी नक्कीच मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी अतिरिक्त आयु्क्त (प्रकल्प) अभिजित बांगर, आयआयटी मुंबईचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. के.व्ही. कृष्णराव, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते आणि वाहतूक) मनिष कुमार पटेल तसेच संबंधित अधिकारी व रस्ते कामांमध्ये नियुक्त अभियंते यावेळी उपस्थित होते. एकूण १५० हून अधिक महानगरपालिका अभियंते तसेच सल्लागार कंपन्यांच्या अभियंत्यांचा या कार्यशाळेमध्ये सहभाग होता.

अभियंत्यांनी दक्ष राहणे गरजेचे

मुंबईत सिमेंट कॉँक्रीट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. कोणताही प्रकल्प बांधताना त्यामध्ये गुणवत्तेबाबत आणि तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे असते. त्यासाठी प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या घटकांसोबत चर्चा करून विचारमंथन होणे आवश्यक ठरते, जेणेकरून अडचणी असल्यास त्या योग्यरीत्या सोडवता येतात. हाच विचार नजरेसमोर ठेवून ही विचारमंथन कार्यशाळा होत असून, त्याचा नक्कीच फायदा होईल. रस्ते सिमेंट कॉँक्रीटीकरण केल्यानंतर त्याचे आयुर्मान १० वर्षांच्या दोषदायित्व कालावधी पुरते मर्यादीत न राहता किमान २० पेक्षा अधिक वर्षे टिकून रहावे, अशा दृष्टीने नियोजन करून ही रस्ते बांधणी होणे गरजेचे आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर म्हणाले.

योग्य तंत्रज्ञानाचा वापर करा - प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव

आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव यांनी सिमेंट कॉँक्रीट रस्त्याच्या डिझायनिंगच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाबाबतची माहिती आणि निकष यांची मांडणी केली. तसेच मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ याअनुषंगाने विचार करून सुयोग्य तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुंबईतील मृदा परिक्षणाची अद्यावत आकडेवारी वापरणे शक्य आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी प्रसरण सांध्यातील आदर्श पद्धती आणि आकडेवारी लक्षात घ्यावी. चांगल्या प्रसरण सांध्यामुळे रस्त्याचे आयुष्यमान वाढ होवू शकते. तसेच प्रसरण सांध्यांमधील भेगा, सांध्यातील जास्त अंतर, हलकी आणि जड वाहतूक लक्षात घेता कोणत्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी, या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी विविध स्वरूपाच्या चाचण्यांचा समावेश करण्यावरही त्यांनी भर दिला.

सिमेंटच्या रस्त्यावर पडणाऱ्या भेगा तंत्रज्ञानाने बुजवा!

सिमेंट कॉँक्रीट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना, या विषयावर आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. सध्या सिमेंट कॉँक्रीट रस्त्यांवर पडणाऱ्या भेगांसाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचीही त्यांनी माहिती दिली.

अधिक सक्षम नियोजनाची गरज

सिमेंट रस्त्याच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा चुकांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाअभावी येतात. त्यामुळे गुणवत्ता नियोजनासाठी यापुढच्या काळात विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. गुणवत्ता नियंत्रणासाठी अधिक सक्षमपणे नियोजन करण्याची गरज उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी कार्यशाळेच्या समारोपाच्या प्रसंगी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in