मुंबई : कांदिवलीत २०१३ साली गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत दोन लहान मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना निष्काळजीपणामुळे झाली असून या प्रकरणात दोषी आढळलेल्या भंगार विक्रेत्याला न्यायालयाने बुधवारी १ वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षाने आरोपी बबलू पासवान याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध करण्याची मागणी केली होती. मात्र, मृत्यू घडवून आणण्याचा ठोस हेतू असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. दिंडोशी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश नंदकिशोर मोरे यांनी पासवान याला गुन्हेगारी निष्काळजीपणाबद्दल दोषी ठरवले.
कांदिवलीत एका चाळीत २०१३ साली भंगार विक्रेता बाबलू पासवानच्या निष्काळजीपणामुळे लागलेल्या आगीत दोन अल्पवयीन मुले आणि दोन महिलांचा मृत्यू झाला होता. न्यायालयाने त्याला निष्काळजीपणामुळे मृत्यू, जीवनास धोका निर्माण करणाऱ्या कृतीमुळे गंभीर दुखापत आणि आग किंवा ज्वलनशील पदार्थांबाबत निष्काळजी वर्तन अंतर्गत दोषी ठरवले.
...त्याने पेटती सिगारेट फेकली
पासवान आपल्या भंगाराच्या दुकानासमोर असलेल्या उघड्या नाल्यात ज्वलनशील गॅस असलेला सिलिंडर रिकामा करत होता. स्थानिक रहिवाशांनी ही कृती धोकादायक असल्याचा इशारा दिला तरीही पासवानने ती सुरूच ठेवली. जवळच असलेल्या अब्दुल खान नावाच्या व्यक्तीने पेटती सिगारेट नाल्यात टाकल्याने आग भडकली आणि ती संपूर्ण परिसरात पसरली.