मुंबई : खटला प्रभावीपणे चालत नसेल तर आरोपीला बेभरवशी काळासाठी तुरुंगात डांबता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटमधील आरोपीला जामीन मंजूर करताना सत्र न्यायाधीश अनिल साळुंखे यांनी हा निर्णय दिला. खटल्याच्या रखडपट्टीमुळे वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडणाऱ्या आरोपींना सत्र न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्यावर्षी जानेवारीमध्ये भायखळ्यात पोलिसांनी बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यातील आरोपी उमरान बलबले याने जामिनासाठी अॅड. गणेश नागरगोजे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी घेताना न्यायालयाने पोलिस तपासातील त्रुटींवर बोट ठेवत सरकारी पक्षाला झटका दिला. बनावट नोटांच्या रॅकेटच्या तपासाची संपूर्ण कागदपत्रे बारकाईने तपासली. त्या कागदपत्रांवरून अर्जदार आरोपीचा बनावट नोटा तयार करण्यात सहभाग असल्याचे कुठेही दिसून येत नाही. तसेच या गुन्ह्याचा खटला प्रभावीपणे चालत नाही. अशा स्थितीत आरोपीला बेभरवशी काळ तुरुंगात डांबता येणार नाही. आरोपीला दिर्घकाळ तुरुंगात ठेवणे कायद्याच्या नजरेत योग्य ठरणारे नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी बलबलेची जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले. राज्यातील कनिष्ठ न्यायालयांत प्रलंबित फाैजदारी खटल्यांचे प्रमाण प्रचंड आहे. त्या खटल्यांच्या रखडपट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर आरोपी दिर्घकाळ तुरुंगात आहेत. संबंधित आरोपींना सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.