
मुंबईमध्ये (Mumbai) समाजवादी पक्षाच्या (Samajvadi Party) कार्यकर्त्यांनी ५ क्रांतिकारी वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या (Revolutionary Workers' Party of India) कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रांतिकारी वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे (RWPI) काही कार्यकर्ते हे मुंबईतील शिवाजी नगरमध्ये स्थानिक स्वच्छतेबद्दलची माहिती लोकांना देत होते. यावेळी तिथे समाजवादी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत त्यांना मारहाण केली. यामध्ये क्रांतिकारी वर्कर्स पार्टीचे कार्यकर्ते जखमी झाले असून यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, मारहाण केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असून डॉ. पूजा, अविनाश, बबन, शशांक आणि आशय अशी त्यांची नवे आहेत. शिवाजी नगर पोलिसांनी दोन्ही पक्षातील लोकांना अटक केली असून पुढील कारवाई करत आहेत.
क्रांतिकारी वर्कर्स पार्टीच्या फेसबुकवरून व्हिडीओ आणि फोटो शेअर करत यासंदर्भातील माहितीही दिली आहे. या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, "मुंबईच्या शिवाजी नगर परिसरामध्ये स्थानिक समस्यांबाबत बोलण्याकरिता तेथील नागरसेविकांना भेटण्यास गेले असता त्यांचे पती फहाद आजमी यांनी स्वतः आपल्या गुंडांसमवेत आमच्यावर हल्ला केला. आम्हाला मारहाण करत सोबत असलेल्या महिलेचे कपडेदेखील फाडले. विशेष म्हणजे मुंबईच्या या भागात समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे निवडणून आले आहेत. पण, विकासाची गोष्ट तर सोडाच, मूलभूत सुविधाही या भागात उपलब्ध नाहीत. परिसरात अनेक ठिकाणी घाण पाणी साचलेले दिसते. अशाच काही समस्या घेऊन जेव्हा रिव्होल्युशनरी लेबर पार्टी ऑफ इंडियाने अभियान सुरु केले म्हणून अबू आझमींच्या गुंडांनी आम्हाला मारहाण केली."