

मुंबई : पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या हद्दीतील सायन पुलाचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
मध्य रेल्वेच्या हद्दीतील सायन पुलाचे काम रेल्वेमार्फत मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येत आहे. रेल्वे हद्दीतील मुख्य पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे विभागामार्फत तर महापालिका हद्दीतील पोहोच मार्गाचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम रेल्वे विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत करण्यात येत आहे.अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. दरम्यान, निविदेनुसार या पुलाचे पुनर्बांधणीचे काम करण्याचा कालावधी हा फेब्रुवारी २०२७ पर्यंतचा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत शीव पूलाच्या पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग ते संत रोहिदास मार्ग (धारावी) पर्यंतच्या पोहोच रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम प्रगतिपथावर आहे. लालबहादूर शास्त्री मार्गावर पादचाऱ्यांसाठी नवीन भुयारी मार्ग बांधण्यात आला असून पादचाऱ्यांसाठी २० फेब्रुवारी रोजी खुला करण्यात आला आहे. तसेच संत रोहिदास मार्गावर पादचा-यांसाठी भूयारी मार्गाची पुनर्बांधणी कामाचे काम पूर्ण झाले असून पादचा-यांसाठी १४ जुलै रोजी खुला करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेमार्फत पहिल्या गर्डरच्या डेक स्लॅबचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच, दुसरा गर्डर ९ ऑगस्ट २०२६ रोजी लोहमार्गावर लॉन्च करण्यात आला आहे.