

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सर्व परीक्षांसाठी परीक्षार्थींनी निर्धारित परीक्षा वेळेच्या किमान ३० मिनिटे अगोदर परीक्षा कक्षात उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळ, व्यवस्थापन परिषद तसेच विद्वत परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार हा नियम लागू करण्यात आला आहे.
परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थांची ओळखपत्र तपासणी, आसनव्यवस्था, आवश्यक पडताळणी आणि इतर परीक्षा प्रक्रियांसाठी वेळ आवश्यक असतो. त्यामुळे परीक्षा सुरू होण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी परीक्षा कक्षात येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणी परीक्षा केंद्रावर किंवा परीक्षा कक्षात न येता आवश्यक ती पूर्वतयारी करून वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांचे संचालक व प्रमुख, संलग्न, संचलित व स्वायत्त महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थांचे संचालक तसेच विद्यापीठाच्या विविध उपपरिसरांचे समन्वयक व संचालक यांनी ही सूचना सर्व परीक्षार्थी, शिक्षक आणि परीक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले आहे.