मुंबई-ठाण्यात आज पावसाचा इशारा

मुंबई आणि महानगर क्षेत्रात हवामानातील बदल सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी २२ आणि २३ एप्रिल रोजी 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
मुंबई-ठाण्यात आज पावसाचा इशारा
मुंबई-ठाण्यात आज पावसाचा इशारासंग्रहित फोटो
Published on

देवश्री भुजबळ/मुंबई :

मुंबई आणि महानगर क्षेत्रात हवामानातील बदल सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी २२ आणि २३ एप्रिल रोजी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या काळात उष्ण आणि दमट हवामानासह विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी सकाळी नवी मुंबई, बदलापूरसह ठाणे जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली, तर मुंबई आणि परिसरात ढगाळ हवामान होते. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३४.९ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, ते सरासरीपेक्षा २.४ अंशांनी जास्त होते. किमान तापमान २५.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील ४८ तासांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज असून कमाल तापमान ३५ अंश आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांकरिता पावसाचा 'येलो अलर्ट' दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची ही स्थिती मान्सूनपूर्व हवामानातील बदलाचा भाग असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील या बदलामुळे वीज पडणे, पिकांचे नुकसान आणि स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा आणि काळजी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in