मुंबई, ठाणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा! तापमान ४ अंशानी घटले; पुढील काही दिवस तडाखा जाणवणार नाही

गेले तीन दिवस मुंबई, ठाण्यासह राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने अंगांची लाहीलाही झाली होती.
मुंबई, ठाणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा! तापमान ४ अंशानी घटले; पुढील काही दिवस तडाखा जाणवणार नाही

मुंबई : गेले तीन दिवस मुंबई, ठाण्यासह राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने अंगांची लाहीलाही झाली होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. मुंबईत ३९ अंश सेल्सिअसवर तर मुंबई ठाण्यात ४२ वर पोहचलेल्या पाऱ्यामुळे उन्हाच्या झळांनी अंगाची काहीली झाली. हे उच्चांकी नोंदवलेले तापमान बुधवारी चार अंशांनी खाली आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत ३४.२ अंश, ठाण्यात ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील काही दिवस मुंबईतील उष्णतेच्या लाटेची शक्यता कमी असेल, असे प्रादेशिक हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबई, ठाणे परिसरात सलग तीन दिवस उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले. रविवारी, सोमवारी पारा उच्चांकी नोंदवला गेला. सोमवारी एक-दोन अंशांनी पारा खाली आला, मात्र उन्हाची काहीली कायम राहिली. बुधवारी पारा चार अंशांनी खाली आला. वातावरण उष्ण व दमट राहिले. मुंबईत ३८ अंशावर नोंदवले गेलेले तापमान बुधवारी घट होऊन ३४.२ तर ठाणेतील ४२ वर गेलेला पारा ३८ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले.

logo
marathi.freepressjournal.in