मुंबई विद्यापीठाचा बी.एस्सीचा निकाल जाहीर; ३७.५४ टक्के निकाल: ४० विद्यार्थ्यांचे निकाल कॉपी प्रकरणामुळे रोखले

मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र ६ या महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
मुंबई विद्यापीठाचा बी.एस्सीचा निकाल जाहीर; ३७.५४ टक्के निकाल: ४० विद्यार्थ्यांचे निकाल कॉपी प्रकरणामुळे रोखले

मुंबई : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र ६ या महत्त्वाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत २०९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.५४ एवढी आहे. या परीक्षेतील ४० विद्यार्थ्यांचे निकाल कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत.

तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र ६ या परीक्षेसाठी ८ हजार २६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७ हजार ९४७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये २ हजार ९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ३ हजार ५९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ३७.५४ टक्के एवढा लागला आहे. तर ३२१ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. ४० विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर १२५१ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने १०६७ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यापीठाने वाणिज्य शाखेच्या निकालाबरोबरच विज्ञान शाखेचा निकालही ३० दिवसाच्या आत जाहीर केला आहे.

दरम्यान, या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून यामुळे एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. मागील उन्हाळी सत्राच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकाल राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर झाले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाइल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविलेली होती. ती फाइल परीक्षा केंद्राने डाऊनलोड करून विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली गेली. यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास मिळाली व या कारणासाठी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले नाहीत. तसेच विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे का नाही, यासाठी ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली आहे.

मूल्यांकनासाठी विशेष टीम

मूल्यांकन वेळेवर होण्यासाठी एक विशेष टीम कार्यरत होती. याला सर्व प्राध्यापक व प्राचार्यांचे सहकार्य मिळाले. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी विशेष लक्ष दिले.

logo
marathi.freepressjournal.in