
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या १०० वर्षाहून अधिक जुन्या आणि प्रतिष्ठित मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीमधील (आधीचा अर्थशास्त्र विभाग) 'डॉ. एस. ए. दवे सेंटर फॉर रिसर्च अँड टीचिंग इन फायनान्स'च्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांना हवामान बदल, हवामान वित्त (क्लायमेट फायनान्स) आणि शाश्वत विकासाचे धडे गिरवता येतील. या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विद्यापीठाने नुकताच बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट लखनऊसोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट संस्थेमार्फत हवामान वित्ताच्या विशिष्ट क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना लखनऊ येथील 'एक्सपेरिअन्शियल क्लायमेट चेंज लॅब' मध्ये शिकण्याचा लाभमिळेल. तसेच, या विद्यार्थ्यांना बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट, लखनऊ येथे इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून धोरणात्मक संवाद घडवून आणण्यासाठी या क्षेत्रातील प्रगत अभ्यास, संशोधन, परिसंवाद आणि परिषदांच्या स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
करारावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य अजय भामरे, बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक आणि विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. निरूपम मेहरोत्रा, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, विभागाच्या संचालिका प्रा. मनिषा करने, दवे सेंटरच्या समन्वयक डॉ. माला लालवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
देशातील आर्थिक विचार आणि धोरण निर्मितीला आकार देणाऱ्या विद्वानांचा समृद्ध वारसा लाभलेले सर्वात जुने अर्थशास्त्र विभाग म्हणून मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागाची ओळख आहे. नुकत्याच या विभागाला यूडीआरएफ रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे. या विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. एस.ए. दवे, (युटीआय आणि सेबीचे माजी अध्यक्ष) यांच्याकडून मिळालेल्या शताब्दी वर्षाची भेट म्हणून डॉ. एस.ए. दवे सेंटर फॉर रिसर्च अँड टीचिंग इन फायनान्स स्थापन करण्यात आले आहे. बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट लखनऊ ही राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), देशाच्या विकास बँकेने पुरस्कृत केलेली एक स्वायत्त संस्था असून भारतातील आणि परदेशातील कृषी आणि ग्रामीण विकास बँकिंग क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला सेवा प्रदान करणारी एक प्रमुख संस्था म्हणून ती ओळखली जाते.
क्लायमेट फायनान्स ही भविष्याची गरज - कुलगुरू
क्लायमेट फायनान्स हे केवळ भविष्यातील गरज नसून, आजच्या घडीला एक अपरिहार्य क्षेत्र बनले आहे. विद्यार्थ्यांना या उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण क्षेत्रात ज्ञान आणि अनुभव मिळावा, यासाठी या दोन्ही संस्थांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यातून विद्यार्थी जागतिक हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होतील. तसेच देशाच्या शाश्वत विकासासाठी योगदान देऊ शकतील, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. त्याचबरोबर हवामान बदलाशी संबंधित आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी आणि शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठीही या कराराचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.