सेमीकंडक्टर क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे पाऊल; एकात्मिक सर्किट चिप सादर; स्वदेशी चिपला 'सेमीकॉन'मध्ये सन्मान

नवी दिल्ली येथे आयोजित 'सेमीकॉन इंडिया २०२५' मध्ये पंतप्रधानांना सादर केलेल्या एकात्मिक सर्किट चिप्सच्या ऐतिहासिक कोलाजमध्ये या संस्थेच्या चिपला स्थान मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रात शिक्षण संस्थांचे योगदान अधोरेखित झाले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर, या संस्थेने तयार केलेली स्वदेशी बनावटीची चिप भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित 'सेमीकॉन इंडिया २०२५' मध्ये पंतप्रधानांना सादर केलेल्या एकात्मिक सर्किट चिप्सच्या ऐतिहासिक कोलाजमध्ये या संस्थेच्या चिपला स्थान मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रात शिक्षण संस्थांचे योगदान अधोरेखित झाले आहे.

भारत सरकारच्या 'चिप्स टू स्टार्टअप (सी२एस)' कार्यक्रमांतर्गत विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांच्या चमूने ही प्रोग्रामेबल गेन एम्पलीफायर (पीजीए) आयसी चिप यशस्वीरित्या डिझाइन केली आहे. ही चिप मोहाली येथील सेमीकंडक्टर लॅबोरेटरी (एससीएल) मध्ये १८० nm CMOS तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली. या प्रकल्पाला भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून रुपये ८२.५९ लाखाचे अनुदान मिळाले आहे.

सेमीकंडक्टर क्षेत्रातील या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इंडस्ट्री-एकेडेमिया श्रेणीमध्ये निवडले गेलेले विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर हे महाराष्ट्रातील एकमेव खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात उद्योग भागीदार म्हणून पनाश डिजिलाईफ ही कंपनी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेल्या या चिप्सचा वापर करून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणार आहे.

देशातील शिक्षण संस्था, विशेषतः मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये, अत्याधुनिक संशोधन आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या संस्थेने दिलेले योगदान हे उच्च शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रातील सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण असून भविष्यात नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानामध्ये अधिक योगदान देण्यासाठी विद्यापीठातील इतर महाविद्यालये आणि संस्थांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in