मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची अन्वेषण स्पर्धेत सुवर्ण कामगिरी; २ सुवर्ण, २ कांस्यपदकांची कमाई; आंतरराष्ट्रीय संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार

संशोधक विद्यार्थ्यांनी २ सुवर्ण आणि २ कांस्यपदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दोन दिवस चाललेल्या या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागीय क्षेत्रातून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातील एकूण ३२ विद्यापिठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली होती.
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची अन्वेषण स्पर्धेत सुवर्ण कामगिरी; २ सुवर्ण, २ कांस्यपदकांची कमाई; आंतरराष्ट्रीय संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने सरदार पटेल विद्यापीठ गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी २ सुवर्ण आणि २ कांस्यपदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दोन दिवस चाललेल्या या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागीय क्षेत्रातून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातील एकूण ३२ विद्यापिठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली होती.

२० आणि २१ जानेवारी २०२६ दरम्यान या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाने सादर केलेल्या ६ गटांपैकी ४ गटात प्राविण्य संपादन केले आहे. मूलभूत शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे गटात २ सुवर्ण पदके आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि आरोग्य विज्ञान गटात २ कांस्य पदके विद्यापीठाला मिळाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी विशेतज्ज्ञ म्हणून डॉ. शशीकुमार मेनन, प्रा. सुनीता शैलेजन, डॉ. मीनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रूपा राव, डॉ. मनीष देशमुख, डॉ. ललिता मुतरेजा, डॉ. वैशाली निरमळकर, डॉ. प्रज्ञा कोर्लेकर आणि डॉ. रसिका पवार यांनी काम पाहिले. चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. कीर्तीकुमार बडगुजर, डॉ. सुरेखा शेट्टी आणि डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले.

वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आयोजन

भारतीय विद्यापीठ संघाच्या निर्देशानुसार (एआययू) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधी उपलब्ध करून देणे, उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधीची उपलब्धता करून देणे, संशोधनवृत्तीला बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अधिकाधिक सहभागिता वाढवणे अशा महत्त्वाकांक्षी उद्देशासह २००८ पासून विद्यार्थी संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

९ गटांतून होते सादरीकरण

कृषी, मूलभूतशास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र, सामाजिकशास्त्रे, मानव्यविद्या, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी व आंतरविद्याशाखीय संशोधन अशा ९ गटांतून या स्पर्धेत पोस्टर किंवा मॉडेल सादरीकरण आणि मौखिक सादरीकरण या दोन वर्गवारीतून स्पर्धकांना सादरीकरण करावे लागते.

या विषयात पटकावली पदके

मूलभूत शास्त्रे गटात राहुल मिश्रा या विद्यार्थ्यांने ‘मलेरिआचे नियंत्रण’ हा संशोधन प्रकल्प सादर करून सुवर्णपदक प्राप्त केले. सामाजिक शास्त्रे या गटात तेजस पवार या विद्यार्थ्यांने ‘इतिहासाचे वर्गीकरण’ याचे सादरीकरण करून सुवर्णपदक पटकावले. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान गटात ‘अती थंड माध्यमाविना कार्य करणारे नावीन्यपूर्ण साधन’ या संकल्पनेवरील महेश पुजारी, एकता कदम आणि अमर वर्मा यांनी कांस्यपदक, तर आरोग्य विज्ञान गटात संकेत गुलभिले, वर्षा छाब्रिया यांनी ‘मूत्र विश्लेषक’ प्रकल्प सादर करून कांस्यपदक पटकावले.

logo
marathi.freepressjournal.in