मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तासांसाठी स्थानिक हवामान अंदाजानुसार, संध्याकाळी/रात्री आकाश अंशतः ढगाळ राहील आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

देवश्री भुजबळ/मुंबई

मुंबईत गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दक्षिण मुंबईच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. मान्सूनने माघार घेतल्यानंतर मुंबईत ऐन दिवाळीत दुसऱ्यांदा पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने गुरुवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला.

पुढील काही दिवसांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून विदर्भ प्रदेश वगळता संपूर्ण राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळी वाऱ्यांच्या अभिसरणामुळे अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. १० ऑक्टोबर रोजी मान्सून परतल्यापासून मुंबई शहरात सामान्यपेक्षा जास्त तापमान आणि हवेचा दर्जा निर्देशांक अतिशय खराब पातळीवर नोंदवला गेला होता. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली होती.

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील ४८ तासांसाठी स्थानिक हवामान अंदाजानुसार, संध्याकाळी/रात्री आकाश अंशतः ढगाळ राहील आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअस राहील आणि अनुक्रमे २६ अंश सेल्सिअस राहील. दरम्यान, दिवाळीच्या सणादरम्यान खराब श्रेणीत (२०० पेक्षा जास्त) असलेला मुंबईचा एक्यूआय गुरुवारी मध्यम श्रेणीत १०९ नोंदवला गेला.

logo
marathi.freepressjournal.in