

मुंबई : वाढत्या उष्णतेमुळे आधीच मुंबईकरांचा घामटा निघत आहे. त्यात पुढील काही दिवस मुंबईचा पारा ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाला आहे. त्यात एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा चढाच राहणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उष्णतेच्या लाटांमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत वेगाने घट होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा १५ मार्च २०२६ रोजी अर्ध्याहून कमी म्हणजेच ६ लाख ६८ हजार ११० दशलक्ष लिटर इतका आहे.
दरम्यान, २०२५ च्या तुलनेत यंदा पाण्याचा साठा ४ टक्क्यांनी जास्त असला तरी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिकेने केले आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, तुळशी व विहार या सात धरणातून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.
मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
जानेवारी, फेब्रुवारी महिना म्हणजे थंडीचा महिना. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उकाड्याने मुंबईकरांचा घामटा निघत आहे. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता अधिक असते. त्यात मार्च महिन्यात सातही धरणांतील पाणीसाठा ६ लाख ६८ हजार ११० दशलक्ष लिटर उपलब्ध आहे. पुढील एप्रिल व मे महिन्यात धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिका पालिका प्रशासनाने केले आहे.
१५ मार्च २०२६ रोजी जलसाठा उपलब्ध (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा - १,२५,५९७
मोडक सागर - ४९,३८८
तानसा - ६०,६८३
मध्य वैतरणा - ८१,२६९
भातसा - ३,२९,५५६
विहार - १७,३९८
तुळशी - ४,०३८