पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले; राखीव पाणीसाठ्याने मुंबईला तारले

धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने मुंबईकरांसाठी २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास राज्य सरकारने होकार दिला आहे.
पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले; राखीव पाणीसाठ्याने मुंबईला तारले

मुंबई : धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने मुंबईकरांसाठी २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास राज्य सरकारने होकार दिला आहे. त्यामुळे शुक्रवार, १ मार्चपासून मुंबईवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. दरम्यान, जून महिन्यापासून पावसाने हजेरी लावली, तर राखीव पाणीसाठा उचलण्याची गरज भासणार नाही, असे पालिकेच्या जलविभागाने स्पष्ट केले.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४३ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. शुक्रवार, १ मार्च रोजी सातही धरणात ६ लाख १७ हजार ६६१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे ६ टक्के पाणी कमी आहे. तलावांमध्ये असलेला पाणीसाठा पुढील १७५ दिवस म्हणजे ऑगस्टच्या मध्यापर्यंत पुरेसा आहे; मात्र मार्च ते मे या कालावधीत उन्हाचा तडाखा वाढतो. त्यामुळे तलावांतील पाण्याचे बाष्पीभवन होते. मे महिन्यात बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून तलावांतील पाणी साठा कमी होण्याची शक्यता अधिक असते. त्यात पाणी चोरी व गळतीमुळे ३० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे लहरी पाऊस याचा विचार करत मुंबईत पाणी कपात करण्याबाबत विचाराधीन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१ मार्च २०२४ रोजी तलावातील पाणीसाठा

(दशलक्ष लिटर व टक्के)

-अप्पर वैतरणा १,५५,६२२ (६८.५४)

-मोडकसागर ४४,३८६ (३४.४३)

-तानसा ७६,११२ (५२.४६)

-मध्य वैतरणा २४,१५१ (१२.४८)

-भातसा २,९८,२४३ (४१.५९)

-विहार १४,७५८ (५३.२८ )

-तुळशी ४,३९८ (५४.६६)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in