मुंबईच्या पाण्याचा ‘जोर’ आणखी वाढणार; भांडुप संकुलात ९०० MLD क्षमतेचा पंप बसवणार 

मुंबईच्या पाण्याचा जोर लवकरच आणखी वाढणार आहे. यासाठी भांडुप संकुलात आणखी एक ९०० दशलक्ष लिटर क्षमतेचा पंप बसवण्यात येणार असून त्यामुळे मुंबईला आणखी ‘फोर्स’मध्ये पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
मुंबईच्या पाण्याचा ‘जोर’ आणखी वाढणार; भांडुप संकुलात ९०० MLD क्षमतेचा पंप बसवणार 
मुंबईच्या पाण्याचा ‘जोर’ आणखी वाढणार; भांडुप संकुलात ९०० MLD क्षमतेचा पंप बसवणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : मुंबईच्या पाण्याचा जोर लवकरच आणखी वाढणार आहे. यासाठी भांडुप संकुलात आणखी एक ९०० दशलक्ष लिटर क्षमतेचा पंप बसवण्यात येणार असून त्यामुळे मुंबईला आणखी ‘फोर्स’मध्ये पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

भांडुप संकुलातून जलवाहिनीद्वारे मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या तेथे २२० दशलक्ष लिटर क्षमतेचा पंप आहे. परंतु मुंबईला आणखी फोर्समध्ये पाणीपुरवठा करता यावा यासाठी ९०० दशलक्ष लिटर पाणी वाहून नेणारा पंप बसवण्यात येणार आहे. भांडुप कॉम्प्लेक्स येथील ९०० एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) उदंचन केंद्रात ३४३७.५ घन मीटर प्रति तास क्षमतेचा सेंट्रीफ्यूगल पंप सेट बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा सेंट्रीफ्यूगल पंप मोठ्या प्रमाणात पाणी जलद गतीने उचलून पुढे पाठविण्यास सक्षम असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.

भांडुप येथील उदंचन केंद्र हे मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. येथे बसविण्यात येणारा नवीन पंप कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये पाण्याचा दाब (प्रेशर) सुधारेल आणि पाणीपुरवठ्यातील अडथळे कमी होतील, असे पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच जुन्या यंत्रणांवरील ताण कमी होऊन देखभाल खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे. विशेषतः उष्णतेच्या काळात किंवा पाण्याची मागणी वाढल्यास या पंपामुळे पुरवठा सुरळीत ठेवणे सोपे होणार आहे.

महापालिकेचा हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना अधिक ‘फोर्स’मध्ये पाणी उपलब्ध होणार आहे.

मुंबईकरांच्या पाण्याची हालहवाल

मुंबईला दररोज सुमारे ३,९५० ते ४,००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तो प्रामुख्याने भातसा, मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा यांसारख्या सात प्रमुख धरणांमधून येतो. हे पाणी भांडुप आणि पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध करून मुंबईला (शहर आणि उपनगरे) पुरवले जाते .

  • पाणी गळती, चोऱ्या तसेच जुने पाईप्स इत्यादीमुळे दरदिवशी सुमारे ९०० दशलक्ष म्हणजे वीस टक्के पाण्याची गळती होते.

  • जुन्या पाईपलाईन्समुळे दक्षिण मुंबईचा बहुतांश भाग तसेच शहराच्या मध्य भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत

  • भविष्य - वाढत्या लोकसंख्येमुळे, पुढील १५ वर्षांत अतिरिक्त ३,००० MLD पाण्याची गरज भासणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in