

मुंबई : चर्चगेट लोकलमधून खाली पडून मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबीयांना भरपाई नाकारणाऱ्या पश्चिम रेल्वे प्रशासनाला सोमवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. लोकलचा गर्दीमुळे खाली पडून मृत्यू होणे ही रेल्वे कायद्यानुसार ‘अनुचित घटना’ आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना ८ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली.
आरोग्यराज चेटियार हे २० जून २००९ रोजी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीच्या उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले. त्यानंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात होते. तिथे त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला होता. आरोग्यराज यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी भरपाईसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेकडे दावा केला होता. तथापि, रेल्वे दावा न्यायाधिकरणाने त्यांचा दावा फेटाळला होता. मृत व्यक्ती ही वैध प्रवासी नव्हती. संबंधित अपघात रेल्वे कायद्याच्या कलम १२३(क)(२) अंतर्गत येत नाही, असे न्यायाधिकरणाने म्हटले होते. त्या निर्णयाविरोधात आरोग्यराज यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी सोमवारी निकाल दिला.
रेल्वेचा दावा केवळ संशयावर आधारित
रेल्वेकडे मृत व्यक्ती रूळ ओलांडत असल्याचा कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. त्यावरून रेल्वेचा दावा केवळ संशयावर आधारित असल्याचे स्पष्ट होते. मृत प्रवाशासोबत प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी सहप्रवाशाची साक्ष न्यायाधिकरणाने दुर्लक्षित केली, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना एकूण ८ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली.