Mumbai : 'शेअर' रिक्षात महिलेचा विनयभंग, धावत्या रिक्षातून उडी घेतल्याने जखमी; दोघांना अटक

२९ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली येथे राहत असून, एका खासगी कंपनीत कामाला आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी शेअर रिक्षात बसली होती.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : महिलेच्या विनयभंगप्रकरणी रिक्षाचालकासह दोघांना बोरिवली पोलिसांनी अटक केली. संजीव छतू राम आणि धीरजकुमार अयोध्याप्रसाद तिवारी अशी या दोघांची नावे आहेत. चालत्या रिक्षातून उडी घेतल्याने या महिलेला किरकोळ दुखापत झाली होती. यातील धीरजकुमारविरुद्ध सोळा वर्षांपूर्वी एक हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले.

२९ वर्षांची तक्रारदार महिला कांदिवली येथे राहत असून, एका खासगी कंपनीत कामाला आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी शेअर रिक्षात बसली होती. यावेळी रिक्षात आधीच बसलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला; ती प्रचंड घाबरली. सांगूनही रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवल्याने तिने चालत्या रिक्षातून उडी घेतली. त्यात तिला किरकोळ दुखापत झाली. घडलेला प्रकार तिने बोरिवली पोलिसांना सांगून रिक्षाचालकासह दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना काही तासांत संजीव राम आणि धीरजकुमार तिवारी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in