मुंबईकरांवर लवकरच जलसंकट येण्याची शक्यता

सातही धरणात फक्त ३० ते ३५ दिवसांचा म्हणजेच ११.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध
मुंबईकरांवर लवकरच जलसंकट येण्याची शक्यता

मुंबईकरांवर लवकरच जलसंकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा पाऊस चांगला बरसणार, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र जून महिन्याचे १५ दिवस उलटले तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात वरुणराजाची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे सातही धरणात फक्त ३० ते ३५ दिवसांचा म्हणजेच ११.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.७९ टक्के कमी पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याचा ७ दिवसांनी आढावा घेण्यात येईल,त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. दरम्यान, ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असून वरुणराजाची अवकृपा राहिली तर मुंबईकरांसह ठाणे, भिवंडीकरांनाही पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.

यंदा पाऊस वेळेपूर्वीच बरसणार, तसेच ९९ टक्के पाऊस होणार, असे भाकित हवामान विभागाने केले होते. मात्र जून महिन्याचे १५ दिवस उलटले तरी मुंबईसह राज्यातील अनेक भागात वरुणराजाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यातील धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत धरण क्षेत्रात वरुणराजाची दमदार हजेरी लागली नाही तर मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले, असे संकेत मुंबई महापालिकेच्या जल विभागाने दिले आहेत.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र १८ जून, २०२२ रोजी सातही धरणात १ लाख ६० हजार ८३१ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध असून २८ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in