
मुंबई : बदलत्या हवामानामुळे तसेच आजूबाजूच्या अस्वच्छ परिसरांमुळे मुंबई डासांच्या विळख्यात आली आहे. डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत असून रोज ४० हून अधिक जण डासांपासून होणाऱ्या आजारांनी ग्रासले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत दिवसेंदिवस डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून यास महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि मुंबईकरांचे दुर्लक्ष या बाबी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या वर्षी एकूण १३,१४७ लोकांना डासजन्य आजारांची लागण झाली आहे. त्यापैकी मलेरियाचे ७,०४३, डेंगीचे ५,४३५ आणि चिकुनगुनियाचे ६६९ रुग्ण आढळून आले आहेत, तर २०२३ मध्ये मुंबईत एकूण १२,१९७ लोकांना डासजन्य आजाराची लागण झाली होती. त्यात डेंगीचे ५,२६१, मलेरियाचे ६,७१२ आणि चिकनगुनियाचे २२४ रुग्ण होते. त्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यंदा मुंबईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्येही पाऊस झाला आहे. परिणामी आजूबाजूच्या वातावरणात बदल झाले आहे. यामुळे डासांपासून पसरणाऱ्या आजारांचा प्रसार वाढला आहे. परंतु, मुंबईमध्ये डासांमुळे अधिक रुग्ण वाढू नये यासाठी पालिकेकडून डास नियंत्रण उपक्रमावर भर दिला जात आहे, तर मुंबईकरांना स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याबाबत तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने यावर्षी मलेरियाच्या डासांची २४,५४२ आणि डेंगीच्या डासांची १,८२,३७९ असे सुमारे दोन लाखांहून अधिक प्रजनन स्थळे शोधून नष्ट केली आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना केली जात आहे. अशी माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.