

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर म्हणजेच ७ लाख ४७ हजार ४३६ दशलक्ष लिटर इतका आहे. हा पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत मुंबईची तहान भागेल इतका असला तरी मार्च एप्रिल मे महिन्यात कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी व गळतीमुळे पाण्याच्या पातळीत आणखी घट होणार आहे. त्यात बदलत्या वातावरणामुळे पाऊस लहरी झाल्याने जून महिन्यात पाऊस वेळेवर बरसेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.
जानेवारी फेब्रुवारी महिना म्हणजे थंडीचा महिना. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्याच उकाड्याने मुंबईकरांचा घामटा निघत आहे. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता अधिक असते. पुढील दोन तीन महिन्यांत पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिकेने केले आहे.