देशभरासह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी राज्यात व मुंबई शहरात कोरोना रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतल्याने चिंता वाढली आहे. गेले काही दिवस हळूहळू वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येने बुधवारी अचानक मोठी वाढ नोंदवल्याने आरोग्य यंत्रणांची धास्ती वाढली आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ४,०२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून मुंबईत २,२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्येत ५०० हून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. राज्यात कोरोनामुळे बुधवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३,०२८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या १९,२६१ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या माहितीनुसार, बीए ५ व्हेरियंटचे ४ रुग्ण आढळले आहेत. राजधानी मुंबईत बुधवारी २,२९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात शाळा सुरू झाल्यामुळे १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालकांना तसेच शिक्षकांना करण्यात येत आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहनही टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.