मुंबईची आजही 'बेस्ट कोंडी' ; लेखी आश्वासनानंतर काम बंद आंदोलन मागे घेणार

कंत्राटी कामगारांनी बंद पुकारल्याने बेस्ट प्रवाशांचे हाल झाले असून १२ बस आगारातील एक हजार बसेस आगारातच आहेत
मुंबईची आजही 'बेस्ट कोंडी' ; लेखी आश्वासनानंतर काम बंद आंदोलन मागे घेणार

मुंबई : पगार वाढ, मोफत बेस्ट बस प्रवास आदी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. मात्र लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील कंत्राटी कामगारांची आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरु असलेले कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन शुक्रवारी ही सुरुच ठेवण्यावर कंत्राटी कामगार ठाम आहेत. त्यामुळे मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या मुंबईकरांची 'बेस्ट कोंडी' शुक्रवारी कायम राहणार आहे. दरम्यान, मातेश्वरी, डागा ग्रुप, हंसा, टाटा कंपनी, ओलेक्ट्रा स्विच मोबॅलिटी या कंत्राटी कंपनीच्या १,६७१ बसेस पैकी फक्त ६६२ बसेस गुरुवारी प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्या. तर एक हजार ०९ बसेस बस आगारात उभ्या राहिल्याने बेस्ट प्रवाशांचे सलग दुसऱ्या दिवशी मेगा हाल झाले.

मोफत बेस्ट बस प्रवास, पगार वाढ, नादुरुस्त बसेस दुरुस्त करुनच बस आगारा बाहेर सोडाव्यात अशा विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलन छेडले. कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे प्रवाशांना फटका बसला. परंतु बेस्ट उपक्रम, राज्य सरकार व कंपनीकडून कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्याने आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या ५०० हून अधिक कंत्राटी कामगारांनी गुरुवारी ही काम बंद आंदोलन सुरुच ठेवले. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन हजार ३२८ बसेस असून एक हजार बसेस रस्त्यावर धावल्या नसल्याने प्रवाशांचे मेगा हाल झाले. दरम्यान, संपकरी कंत्राटी कामगारांच्या कंपन्यांवर कंत्राटाच्या अटी शर्तीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

वाढत्या महागाईमुळे १८ हजार रुपये पगार २५ हजार रुपये करण्यात यावा, बेस्ट उपक्रमाच्या कायमस्वरुपी कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांना ही बेस्ट बसच्या मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी मुलुंड व घाटकोपर बस आगारातील डागा ग्रुपच्या ५०० हून अधिक कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले. गृहराज्यमंत्री शंभू राजे देसाई यांच्याशी चर्चा केली असता कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी गुरुवारी तब्बल १२ डेपो तील डागा ग्रुप, मातेश्वरी व टाटा कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरुच ठेवले. त्यामुळे गुरुवार मुंबईतील बेस्ट बस सेवेवर परिणाम झाला असून बसेससाठी बस थांब्यावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या आगारावर परिणाम - बसेस बंदच

वरळी - ५३, प्रतीक्षा नगर - ७६, आणिक - ८२, धारावी - ७२, देवनार - ६१, शिवाजी नगर - ७९, घाटकोपर - ८२, मुलुंड - ९१, मजास - ९७, सांताक्रुझ - ८५, गोराई - ७० व मागाठाणे - ५९

कंत्राटी कंपन्या व बसेसची संख्या

मातेश्र्वरी - ४२२

डागा ग्रुप - ५८०

टाटा कंपनी - ३५५

ओलेक्ट्रा - ५९

हंसा - २८०

स्विच मोबॅलिटी - १२

आश्वासनांचा पाऊस

शिवसेना (शिंदे गट) नेते किरण पावसकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्या करून प्रश्न सोडवितो. असे आश्वासन त्यांनी दिले आहे. भाजपा कामगार संघाचे मुंबईचे समन्वयक आणि बेस्ट समितीचे माजी सदस्य सुनील गणाचार्य यांनीही आंदोलनाला भेट दिली. बेस्ट प्रशासन, खासगी कंत्राटदारांचे मालक तसेच शासनासोबत याविषयी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मुंबईचे उपनगराचे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेण्याचे आश्वासन गणाचार्य यांनी दिले आहे. मनसेचे पदाधिकारी आंदोलकांना भेटून गेले.

'चलो वडाळा आगार'

कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्याया विरोधात सर्व कामगार व संघर्ष युनियनने १०० टक्के पाठिंबा जाहीर केला आहे. कंत्राटी कामगार बेस्ट उपक्रमाचे कामगार घोषित करा, समान काम समान वेतन द्या, नोकरीचे सातत्य कायम ठेवण्यासाठी हमी पत्र द्या अशी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता वडाळा बस आगारा बाहेर आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in