

मुंबई : मुंबईच्या मोठाल्या रस्त्यांपासून चिंचोळ्या गल्लीपर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे तसेच मेळाव्याची बॅनरबाजी करणाऱ्यांवर पालिका कडक कारवाई करणार आहे. यामुळे मुंबईचे बकालपण थांबवण्यास मदत होणार आहे. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत पालिकेने पन्नास हजारपेक्षा अधिक अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करूनही बॅनरबाज प्रसिद्धी काही थांबवत नाही. या उलट, बॅनर काढणाऱ्या पालिकेच्या पथकालाच दमदाटी करून मारहाण करण्यात आलीआहे. यासाठी आता अधिक जोमाने गस्त घालणार असल्याचे पालिकेचे अनुज्ञापन विभागाचे अधीक्षक अनिल काटे यांनी सांगितले.
मुंबई शहर आणि उपनगरातील महापालिकेच्या २४ विभागांमध्ये जागोजागी अनधिकृत बॅनर्स पाहायला मिळतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मतदानासाठी आवाहन करण्याचे फलक लागले होते. हे फलक सध्या महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागातील कर्मचाऱ्यांनी हटवले आहेत. मात्र, दररोज नव्याने फलक लावले जातात. यामध्ये राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या वाढदिवसांचे, नियुक्तींचे आणि श्रद्धांजलीचे बॅनर असतात. नेत्यांचे मोठे कट आऊटसुद्धा चौकाचौकामध्ये लावले जातात. धार्मिक कार्यक्रमांचे आणि सत्संगाचे फोटो, बॅनर्स सर्वांच्या नजरेला दिसतात. तर अनेक व्यावसायिक संस्थांकडून त्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातींसाठी फलकबाजी करण्यात येते. महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्यावतीने अशा अनुधिकृत फलकांवर सातत्याने कारवाई केली जाते, अशी माहिती काटे यांनी दिली.
नावाजलेल्या प्रिंटरना नोटिसा
गेल्या वर्षभरात साधारण ५५००० अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १६५३८ राजकीय अनधिकृत बॅनर्सवर, ३२ हजार ४८१धार्मिक फलकांवर तर ४५५१ व्यावसायिक फलकबाजीवर पालिकेने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे हे बॅनर्स छापले जातात अशा प्रिंटर्सना अनधिकृत बॅनर छापू नयेत, यासाठी गेल्या वर्षीपासून नोटीस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील जी दक्षिण विभागातील शाह आणि नाहर इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात असे प्रिंटर्स असल्याचे आढळून आले आहे.
कारवाईसाठी अधिक फेरे करणार
कित्येकदा कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला दमदाटी करणे, राजकीय दबाव आणणे किंवा थेट हल्ला करणे अशा घटना घडतात. नुकतीच आर उत्तर विभागातील कर्मचारी म्हापणकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तरीही आमची पथके काम करीत असतात. आता तर आम्ही पथकांची गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सकाळी दोनदा आणि संध्याकाळी दोनदा विभागात फिरून अशा अनधिकृत फलकांवर कारवाई करणार असल्याचे काटे यांनी स्पष्ट केले.