प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेचा कृती आराखडा; हरित संकल्प राबवणार, तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करणार

प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेचा कृती आराखडा; हरित संकल्प राबवणार, तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करणार

शहराचे तापमान कमी करण्यासाठी सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या पुनर्प्रक्रिया प्रकल्पाद्वारे समुद्रातील प्रदूषण व तापमान कमी होण्यास मदत होणार आहे.
Published on

मुंबई : दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ, बदलते हवामान यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने हवामान कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जात आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण, सागरी पर्यावरण, पारंपरिक ऊर्जेतून निर्माण होणारे प्रदूषण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 'हरित संकल्प' योजना राबवण्यात येत आहे. यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने पालिका अभ्यास करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बदलते हवामान आणि वाढते तापमान जगाला चिंतेत टाकणारा विषय झाला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर विविध परिषदेत पावले उचलली जात आहेत. मुंबईत याची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०२२मध्ये मुंबई हवामान कृती आराखडा बनवण्यात आला आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून या आराखड्यावर काम केले जात आहे. पुढील टप्प्यात पालिकेकडून या आराखड्यांतर्गत हरित संकल्प प्रकल्प पालिकेतर्फे राबविला जाणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहराचे तापमान कमी करण्यासाठी सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या पुनर्प्रक्रिया प्रकल्पाद्वारे समुद्रातील प्रदूषण व तापमान कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सौरऊर्जेचे प्रकल्प वाढविल्यास पारंपरिक ऊर्जा बचत होईल आणि पारंपरिक ऊर्जेतून वातावरणात पसरणारे रासायनिक रोखणे शक्य होणार आहे.

पारंपरिक उर्जा वापराद्वारे हवेत मिसळणारा कार्बन डाय ऑक्साईड रोखण्याचा प्रयत्न करता येणे शक्य आहे. या प्रकारे पाणी, घनकचरा यासह २० ते २५ क्षेत्रासाठी पालिका काम करणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गेल्या वर्षभरात मुंबई हवामान कृती आराखड्याच्या उपक्रमांना विविध क्षेत्रांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

२० टक्के हरित प्रकल्प बंधनकारक

मुंबईत भविष्यात राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पात २० टक्के हरित प्रकल्प राबवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. १०० टक्के कामात २० टक्के जागेवर झाडांची लागवड, मिया वाकी वननिर्मिती असे उपक्रम राबवणे बंधनकारक असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in