अतिधोकादायक इमारत खाली करण्याचे पालिकेचे निर्देश
कुर्ला पूर्व येथील नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळली आणि १९ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींची पुन्हा पडझड होऊ नये, यासाठी अतिधोकादायक इमारत खाली करा, असे निर्देश पालिकेने इमारतीतील रहिवाशांना दिले आहेत. दरम्यान, इमारत खाली केल्यानंतर रहिवाशांना सप्टेंबरपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईत ३८७ धोकादायक इमारती असून, १००हून अधिक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, तर अनेक इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन कट करण्यात आले आहे. तरीही १००हून अधिक धोकादायक इमारतीत रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. नाईकनगर सोसायटीतील चारमजली इमारत कोसळली आणि १९ जणांचा जीव गेला. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांनी इमारत तत्काळ खाली करावी, असे निर्देश दिले आहेत; मात्र काही इमारतीमधील रहिवासी तीव्र विरोध करीत असल्याने इमारती रिकाम्या केल्या जात नाही. अशा इमारतींची यादी करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे लवकरच धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिका कार्यवाही सुरू करणार आहे. अशा इमारतीतील रहिवाशांना सप्टेंबर अखेरपर्यंत पालिकेच्या तात्पुरत्या निवाऱ्यात व्यवस्था केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.