मुंबईकरांना २४ तास पाण्यासाठी प्रतीक्षाच! पाण्याचे स्रोत वाढवण्यावर पालिकेचा भर

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो.
मुंबईकरांना २४ तास पाण्यासाठी प्रतीक्षाच! पाण्याचे स्रोत वाढवण्यावर पालिकेचा भर

मुंबई : मुंबईत वाढती लोकसंख्या त्यात पाणी गळतीची समस्या यामुळे मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी कायम राहिली आहे. त्यामुळे पालिकेने विविध प्रकल्प मार्गी लावून पाण्याचे स्रोत वाढवण्यावर भर दिला आहे. मात्र सद्यस्थितीत तरी मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने पुढील काही वर्ष तरी मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईचा पाणीपुरवठा १४० किलोमीटर अंतरावर होतो. तर धरण क्षेत्र परिसरात राहणाऱ्यांनाही १६० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असून, हे पाणी पिण्यासाठी व शेती कामासाठी वापरले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका आहे. मुंबईची वाढती लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईकरांच्या रोजच्या पाणीपुरवठ्याची मागणी वाढते आहे. त्यामुळे विविध आखलेले पाण्याचे प्रकल्प मार्गी लावून पाण्याचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरू आहेत. मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. सत्ताधारी पक्षाकडूनही २४ तास पाण्याचे आश्वासन मुंबईला देण्यात आले होते. सुरुवातीला मुलुंड व वांद्रे पश्चिम परिसरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र मुंबईची भौगोलिक स्थिती लक्षात घेतल्यास संपूर्ण मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणे सध्या तरी अशक्य आहे. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात उंच टॉवर उभे राहत आहेत, तर दुसरीकडे दाटीवाटीने झोपड्याही उभ्या राहत आहेत. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, उपलब्ध पाणीपुरवठा कमी पडतो आहे. वाढीव पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित गारगाई, पिंजाळ व दमणगंगा यांसारखे नवीन जलस्रोत निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईला ५ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची गरज

मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईकरांसाठी सध्या किमान ५ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची गरज आहे; मात्र प्रत्यक्षात मुंबईला प्रतिदिन ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्याने सध्या आणखी किमान १ हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे.

२५ मेगावॉट वीजनिर्मितीमुळे पैशांची बचत!

तानसा धरणांतून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. या धरण क्षेत्रातील रस्त्यांवरील दिवे, कार्यालयातील वीजपुरवठासाठी २०१७ मध्ये २५ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. सद्यस्थितीत २५ मेगावॉट वीजनिर्मिती होत असल्याने महिन्याला वीज बिलाचे ५० ते ६० हजार रुपयांची बचत होते.

११ हजार कर्मचारी कार्यरत

मुबंई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे ११५० अभियंते व ८९५० कामगार व इतर कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in