मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केल्यानंतर पालिका प्रशासनाला टीकेचा सामना करावा लागला. आता तर सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर मुदतवाढ देण्यात आल्याने पालिका कंत्राटदारावर मेहरबान असा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक खात्यातील सुरक्षा रक्षकांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त असून ही पदे भरण्याबाबत विलंब करत खासगी सुरक्षा कंपनीला मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरक्षा रक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने महापालिकेने रुग्णालय व काही महत्वाच्या ठिकाणी १३५० सुरक्षा रक्षकांची सेवा खासगी सुरक्षा कंपनीकडून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार २०० महिला सुरक्षा रक्षक आणि ११५० पुरुष सुरक्षा रक्षक यांची २३ जुलै २०१४मध्ये सेवा घेण्यास मंजुरी मिळाली.
कंत्राट आता २६२. १५ कोटींच्या घरात
पालिकेच्या रुग्णालयांसह काही महत्वाच्या ठिकाणी १३५० अधिक ३३८ अशाप्रकारे १६८८ एवढ्या खासगी सुरक्षा रक्षकांची तीन वर्षांसाठी जुलै २०१४ रोजी नियुक्ती करण्यात आली; मात्र याचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतरही तारीख पे तारीख याप्रकारे या कंपनीला आजतागायत मुदतवाढ देत निविदा न मागवता सहा वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांच्याकडून सेवा घेतली जात आहे. त्यामुळे दर वर्षाला सुमारे २४ कोटी रुपयांचा खर्च वाढत असून, हे कंत्राट आता २६२. १५ कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहे.