
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेले काही दिवस ते महाविकास आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशीदेखील चर्चा आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून या चर्चा नाकारल्या गेल्या आहेत. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्याच्या चर्चा आहेत. या सर्व बातम्यांवर अजित पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण देताना म्हणाले की, "नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा, यामध्ये काहीही तथ्य नाही,"
दरम्यान, काल अजित पवारांनी आपला दिवसभराचा पुणे दौरा रद्द केल्याने पुन्हा एकदा अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. तसेच, आज त्यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली असल्याचेदेखील सांगण्यात आले. मात्र, त्यावर 'मी आमदारांची कोणतीही बैठक घेतलेली नाही, किंवा कोणत्याही कागदावर सह्या घेतलेल्या नाहीत,' असे स्पष्टीकरण दिले. तसेच, 'मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, प्रसार माध्यम स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे,' असेदेखील ते म्हणाले.
आज राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले असल्याचे या चर्चा सुरु झाल्या. पण, यावर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, "अजित पवारांनी आमदारांची कोणतीही बैठक बोलावली नसून आम्हीच एकत्र भेटणार आहोत. अजितदादा जिथे जातील तिथे अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत असेल." असे सूचक विधानही त्यांनी केले. यामुळे आता पुढे काय होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.