
"राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीच बोलत नाहीत. यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. सीमाप्रश्नाबाबतही एकनाथ शिंदे गप्प आहेत. सगळ्याच बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरत आहे. महाराष्ट्राची आधी अशी अवस्था कधीच झाली नव्हती." अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडी १७ डिसेंबरला मुंबईमध्ये महामोर्चा काढणार आहे. महापुरुषांच्या अवमानाविरोधात राज्य सरकार कुठलीच भूमिका घेत नसल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. अद्याप मविआच्या महामोर्चाला परवानगी मिळाली नसून त्यावर जयंत पाटील म्हणाले की, "मोर्चासाठी राज्य सरकारला परवानगी द्यावीच लागेल. परवानगी न देण्याचा वेडेपणा राज्य सरकार करणार नाही. आता मोर्चा थांबणार नाही. मुंबई पुणे ठाणे पालघर रत्नागिरी पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोर्चासाठी येणार आहेत. आम्ही आवाज उठवणारच."