
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवला' असा आरोप करत ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला 'हर हर महादेव' या मराठी चित्रपटाचा शो बंद पाडला. एवढाच नव्हे तर या दरम्यान त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाणदेखील केली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. ही बातमे येताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया देत म्हंटल की, "जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चुकीच्या चित्रपटाचा विरोध केला म्हणून अटक झाली असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे."
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हंटले की, "महाराष्ट्राच्या पोलीस दलावर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणाचा फोन आला मला माहित नाही, पण वरुन मोठा दबाव आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देवाच्या स्थानी आहेत. जर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काही चुकीचे दाखवले जाते आणि त्याचा विरोध केल्यास अटक केली जाते. या कारणामुळे जितेंद्र आव्हाड यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले आणि जेलमध्ये टाकलं, याचं मी मनापासून स्वागत करते."