मध्य रेल्वेकडून नव्या १० एसी लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांची गर्दीतून सुटका

एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तुरळक असल्याने मूठभर प्रवाशांसाठी लाखो प्रवाशांना दैनंदिन मनस्ताप सहन करावा लागत होता
मध्य रेल्वेकडून नव्या १० एसी लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांची गर्दीतून सुटका
ANI

एसी लोकलबाबत प्रवाशांचा रोष पाहता मध्य रेल्वे प्रशासनाकडून १९ ऑगस्टपासून वाढवण्यात आलेल्या १० लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागी साधारण लोकल धावणार असून यामुळे प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होत प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवरील एसी लोकल संख्या ६६ वरून ५६ एवढी रहणार आहे.

पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेवर ही १९ ऑगस्टपासून एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी १५ ऑगस्ट रोजी ठाणे- सीएसएमटी -ठाणे अप आणि डाउन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या होणार असल्याची माहिती दिली. यातील बहुतांश फेऱ्या सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी ठेवण्यात आल्या. परंतु या नव्या एसी लोकल फेऱ्या वाढवताना जुन्या साधारण फेऱ्या रद्द करण्यात आल्याने मागील १० दिवसांपासून मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी उसळत आहे. एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तुरळक असल्याने मूठभर प्रवाशांसाठी लाखो प्रवाशांना दैनंदिन मनस्ताप सहन करावा लागत होता. याचाच उद्रेक म्हणून कळवा आणि बदलापूर स्थानकात एसी लोकल रद्द करा अशी मागणी करत प्रवाशांनी स्टेशन मास्तरना घेराव घातला. तर सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रवाशांची व्यथा मांडत रेल्वे प्रशासनाला खडे बोल सुनावले. दरम्यान, याचाच परिणाम म्हणून नव्याने सुरू करण्यात आलेल्या १० एसी लोकल फेऱ्या रद्द करत त्या जागी साधारण लोकल चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला असून ट्विटरद्वारे याविषयी माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in