येत्या वर्षात लागू होणार नवे शैक्षणिक धोरण; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

तब्बल ३४ वर्षांनंतर देशात लागू होणार नवे शैक्षणिक धोरण, शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल दिसणार
येत्या वर्षात लागू होणार नवे शैक्षणिक धोरण; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. तसेच, अभियांत्रिकी शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षणही आता मराठीमध्ये शिकवले जाणार आहे. त्यामुळे आता शिक्षण पद्धतीत अनेक नवे आणि मोठे बदल राज्याच्या शैक्षणिक धोरणात होणार आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर संपूर्ण देशामध्ये ही क्रांती घडत असून याचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली दिल्यानंतर आता तब्बल ३४ वर्षांनी नवे शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करण्याचा ऐच्छिक पर्याय असणार आहे. नव्या पद्धतीनुसार, बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी करण्याचा मानस असून त्याबदल्यात सेमिस्टर पद्धतीमध्ये परीक्षा घेतल्या जाऊ शकतात.

सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून एकदा होते. पण नव्या धोरणानुसार, वर्षातून २ वेळा सेमिस्टर पद्धतीनुसार बोर्ड परीक्षा घेतली जाऊ शकते. म्हणजेच इयत्ता नववी ते बारावीमध्ये ८ सेमिस्टर होणार असून महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा विचारही यामध्ये करण्यात आला आहे. पदवीसाठीदेखील कला आणि विज्ञान शाखेत भेद न राखता विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in