सकाळी १० नंतर चौपाट्यांवर पर्यटकांना नो एन्ट्री

भरतीच्या वेळेस समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन चौपाट्यांवर तैनात करण्यात आलेले लाईफगार्ड पर्यटकांना करतात.
सकाळी १० नंतर चौपाट्यांवर पर्यटकांना नो एन्ट्री

मुंबईतील चौपाट्यांवर, समुद्रात खोल पाण्यात गेल्यावर पाण्याचा अंदाज येत नाही आणि जीव गमवावा लागतो. मुंबईत गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढेही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यात हवामान खात्याच्या ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात समुद्रकिनारे फक्त सकाळी ६ ते सकाळी १० या वेळेतच सर्वसामान्यांसाठी खुले राहतील, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

पावसाळ्यात भरतीच्या वेळेस समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन चौपाट्यांवर तैनात करण्यात आलेले लाईफगार्ड पर्यटकांना करतात. मात्र त्यानंतरही अनेक जण विरोध करत अतिउत्साह दाखवण्याचा प्रयत्न करतात. पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडण्याच्या घटनांमध्ये त्यामुळे वाढ होते आहे. १४ जून रोजी जुहू येथे पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुले बुडाली होती. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला. तर इतर काही चौपाट्यांवर पाण्यात उतरणाऱ्यांना लाईफगार्डनी हटकल्याने दुर्घटना टाळता आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व किनाऱ्यांवर वेळेच्या या निर्बंधांची त्वरित माहिती देण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात याव्यात. पोलीस, अग्निशमन दल विभागाचे जीवरक्षक आणि समुद्रकिनाऱ्याच्या देखभालीशी संबंधित कर्मचारी यांना या आदेशांचे पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in