
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर ‘हॅलो’ न म्हणता ‘वंदे मातरम्’ म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केली. खातेवाटप झाल्यावर लगेचच मुनगंटीवारांनी ही घोषणा केली.
मुनगंटीवार म्हणाले, “वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांच्या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतीक आहे. हे गीत त्या काळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम करत होते.भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरू करणार आहोत.
१८०० साली टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करतोय,” असे मुनगंटीवार यांनी सांगितले.