तीन हजार सोसायट्यांना पालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटिसा

तीन हजार सोसायट्यांना पालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटिसा
Published on

पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी उपायोजनांवर भर दिला जात असतानाच, वारंवार आवाहन करूनदेखील अनेक सोसायट्या वृक्षछाटणी करत नसल्याचे समोर आले आहे. अशा तीन हजार सोसायट्यांना पालिकेच्या उद्यान विभागाकडून नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

दरवर्षी पावसाळ्यात झाडे कोसळतात आणि झाडांच्या फांद्या पडून अपघात होतात. पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी अशी झाडे असलेल्या सोसायट्यांना नोटिसा दिल्या जातात; मात्र ज्या सोसायट्या वृक्षछाटणी करत नाहीत, अशा ठिकाणी फांद्या कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे यंदा पालिकेच्या उद्यान विभागाकडून वारंवार अशा सोसायट्यांना वृक्षछाटणीचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र तरीदेखील आजतागायत ६० टक्के सोसायट्यांनी पालिकेच्या उद्यान विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वृक्षछाटणी करून घेतली. त्यामुळे उर्वरित प्रतिसाद न दिलेल्या तीन हजार सोसायट्यांना उद्यान विभागाने नोटीस बजावली आहे. तसेच सोसायट्यांमधील वृक्ष किंवा फांदी कोसळून दुखापत झाल्यास त्या सोसायटीला जबाबदार धरले जाईल, असे परदेशी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in