स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या निवडणुकांत पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू, असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणुका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी अगोदरच जाहीर केले आहे.