भारतीयांचे २०४०पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट होणार ;जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाचा अहवाल प्रसिद्ध

लठ्ठपणा हा केवळ बीएमआयवर ठरवला जाऊ शकत नाही. लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे.
भारतीयांचे २०४०पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट होणार ;जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाचा अहवाल प्रसिद्ध
PM

मुंबई : भारतातील २० ते ६९ वर्षे वयोगटातील जनतेचे २०४० पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट होणार असून, लठ्ठपणाच्या सर्वात जास्त घटना दक्षिण भारतात नोंदल्या गेल्या आहेत. तर सर्वात कमी पूर्व भारतात आहेत, असा अहवाल जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियाने बुधवारी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. निता देशपांडे व डॉ.शशांक शहा यांनी प्रसिद्ध केला.

लठ्ठपणा हा केवळ बीएमआयवर ठरवला जाऊ शकत नाही. लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होणे. ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो. यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात संपूर्ण भारतातील १००५३१ प्रौढांच्या डेटाचे मूल्यमापन केले. देशातील लठ्ठपणाचे प्रमाण ४०.३ टक्के इतके असून, ज्यात महिला, शहरी लोकसंख्या आणि ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे.

भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. वाढत्या लठ्ठपणा बरोबर मधुमेह वाढत आहे. याचे मुख्य कारण बिघडलेली जीवनशैली आहे. २०१९ साली भारतात ७७ दशलक्ष लोकांना मधुमेह झाला असून, आणि २०४५पर्यंत ही संख्या १३४ दशलक्षांपेक्षा जास्त होणार आहे. लठ्ठपणा आणि जास्त वजन हे जगभरात महामारीचे कारण ठरत आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही, असे डॉ. शशांक शाह यांनी सांगितले.

शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय

शारीरिक निष्क्रियता आणि वृध्दत्व यांचा लठ्ठपणाशी संबंध आहे. स्त्रियांमध्ये ओटीपोटाचा लठ्ठपणा सामान्यतः तिशीनंतर विकसित होतो. दुर्दैवाने, ओटीपोटात लठ्ठपणा आणि चयापचय सिंड्रोम असलेल्या भारतीय लोकसंख्येला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका जास्त असतो, असेही डॉ. शशांक यांनी स्पष्ट केले. आहार आणि व्यायामाने लठ्ठपणावर मात करणे अशक्य झाल्यास बेरिएट्रिक शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय ठरतो, असे डॉ. शशांक शाह यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in