
मुंबई : ऑक्टोबरमधील प्रखर उष्णतेने मुंबईकर हैराण झाले आहेत. गुगल वेदरनुसार, शहरातील तापमान ३४ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले असले तरी उष्णता ४१ डिग्री सेल्सिअसप्रमाणे जाणवत आहे. अत्यंत दमट हवामान आणि तीव्र उन्हामुळे दैनंदिन कामकाजादरम्यान अनेकांना घामाच्या धारा वाहत आहेत. लोकल-बेस्ट प्रवास, कामाचे ठिकाण आणि प्रत्यक्षातील महानगरातील फिरणे असे सगळेच त्रासदायक बनले आहेत. हवामान खात्याने तीव्र उन्हाची लाट लवकरच ओसरू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
असामान्य गरमी आणि आर्द्रतेमुळे माणसेच नव्हे तर झाडेही त्रस्त झाली असून अनेकांनी थकवा, निर्जलीकरण आणि गरगरणे याची तक्रार केली आहे. प्रचंड उष्णतेमुळे सोशल मीडियावर मुंबईकरांचा रोष उसळला आहे. अनेकांनी आपल्या अनुभवांची व्यथा व्यक्त केली आहे. एका नेटिझनने लिहिले की, बाहेर चालणे म्हणजे चार एसी कॉम्प्रेसरसमोर उभे राहण्यासारखे वाटते! एकाने निसर्गावर होणाऱ्या परिणामाबद्दल खंत व्यक्त केली, माझी बोगनवेल प्रचंड उष्णतेला तग धरू शकली नाही. कृपया प्रार्थना करा.
एका विद्यार्थ्याने कठीण अनुभवाचे वर्णन करत लिहिले आहे, १०३ डिग्री सेल्सिअस : ताप, भोवळ, उलट्या, निर्जलीकरण आणि दररोज तीन तासांच्या परीक्षेसाठी सहा तास प्रवास हे सगळे मुंबईच्या उष्णतेत! आता तर संपवूनच टाका! दरवर्षी ‘ऑक्टोबर हिट’ म्हणजेच पावसाळ्यानंतरचा प्रखर उकाड्याचा काळ मुंबईत अनुभवायला मिळतो. मात्र यंदा या उष्णतेची तीव्रता नेहमीपेक्षा जास्तच जाणवत आहे. एकाने नेटिझनने चेष्टेच्या स्वरात आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘ऑक्टोबर हिट इस हिटिंग इन मुंबई’.
उष्णता ओसरण्याचा हवामान तज्ज्ञांचा दिलासा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उष्णतेची तीव्रता शनिवारपासून कमी होण्याची शक्यता आहे. तापमान ३२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येईल आणि दमटपणातही थोडा कमी होईल. पुढील आठवड्यात तापमान २८ डिग्री सेल्सिअस ते ३२ अंश डिग्री सेल्सिअस या मर्यादेत राहील. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळेल. सध्या नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा, दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळण्याचा आणि संरक्षणात्मक कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना मुंबईकरांना आता केवळ थोडी हवेची झुळूक आणि या थकवणाऱ्या ऑक्टोबरच्या उष्णतेपासून लवकर मुक्ती मिळावी, अशीच अपेक्षा आहे.