
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मागाठाणे मेट्रो स्थानकालगत विकासकाकडून खोदकाम करत असताना जमीन खचण्याची जी घटना घडली, त्याला राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारी आणि बिल्डरचे संगनमत कारणीभूत आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला आहे. शुक्रवारी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मेट्रो स्टेशनच्या जिन्याच्या ६ मीटर पर्यंत कोणतीही बांधकाम किंवा खोदकाम करू नये, असा नियम असताना, नियमांचे उल्लंघन करून बिल्डरने मेट्रोच्या जागेला स्पर्श करणारी कंपाउंड वॉल बांधली. त्यावेळी मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए आणि एमएमओसीएलचे अधिकारी कुठे होते? झोपले होते का? त्यांनी कारवाई का केली नाही? याचा अर्थ त्यांचे बिल्डरांशी संगनमत होते. जमीन खचल्याने जिन्याखालच्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. या जिन्याचा वापर मेट्रोने ये जा करणारे प्रवासी करतात. त्यामुळे जोराचा पाऊस पडल्यावर यापेक्षाही मोठी दुर्घटना घडली तर त्या दुर्घटनेची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका घेणार का? बिल्डरकडून खोल खोदकाम होत असल्याच्या तक्रारी वारंवार मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए आणि एमएमओसीएलच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि त्याचाच परिणाम ही भूसख्खलनाची दुर्घटना आहे, असा ही आरोप त्यांनी केला.