
एकनाथ शिंदे यांना काय नाही दिले? इतर राज्यांत मुख्यमंत्र्यांकडे जी खाती असतात, ती दिली. २० मे रोजी तर त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत विचारणाही केली होती; मात्र तेव्हा त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतरही त्यांनी २० जून रोजी बंड केले, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. “फुटिरांना महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही. ज्यांना जायचे आहे, ते जाऊ शकतात,” असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधणे, मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. सांताक्रूझ येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘‘बाळासाहेबांचे नाव घेण्याची यांची लायकी नाही. असती तर ते बंड करून सुरतला गेले नसते. यांच्यात खरोखरच लाज, ताकद, स्वाभिमान असता तर यांनी समोरासमोर येऊन बंड केले असते. काही आमदारांना तर मान पकडून, हात पकडून फरपटत सुरतवरून गुवाहाटीला नेल्याचे व्हिडीओ आहेत. स्वतःला आरशात बघायलाही लाज वाटेल, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. अतिशय साध्या संजय पवार यांना पाडण्याचे काम या फुटीरतावाद्यांनी केले. हे पहिलेच बंड असेल की, ज्यात सत्ताधारी पक्षातून आमदार विरोधी पक्षात जात आहेत. प्रत्येक आमदार तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार,’’ असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
“आसाममध्ये पूर आला आहे. तिथे लोकांना खायला अन्न नाही, तिथे तुम्ही मजा मारायला जाताय. संरक्षण खरे तर काश्मिरी पंडितांना द्यायला हवे; पण ते कुणाला दिलं जातंय पाहा,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.