मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून आंदोलन

एका वडापावच्या गाडीवाल्याने या जाळीवर उडी मारून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.
मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून आंदोलन

मुंबई : मंत्रालयात मागील काही काळात आत्महत्या, आत्महत्यांचे प्रयत्न, विविध आंदोलने झाली आहेत. मंत्रालयाच्या मधल्या कॉरिडॉरमध्ये मारल्या जाणाऱ्या उड्या रोखण्यासाठी मजल्यांवर संरक्षक जाळ्या तसेच पूर्ण कॉरिडॉरमध्ये मोठे जाळे लावण्यात आले आहे. मात्र सोमवारी एका वडापावच्या गाडीवाल्याने या जाळीवर उडी मारून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

ॲडविन बंगेरा असे या व्यक्तीचे नाव असून तो बोरिवलीचा रहिवासी आहे. महापालिकेने एका वर्षापूर्वी त्यांच्या वडापावच्या गाडीवर कारवाई करून ती ताब्यात घेतली आहे. तेव्हापासून ही गाडी सोडवण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. पण दाद मिळत नसल्याने अखेर त्यांनी हा मार्ग स्वीकारला. मंत्रालयात तैनात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हवाली केले. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

यापूर्वीही अनेकदा मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारून आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला होता. एकाचा तर जीवही गेला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जाळीवर उडी मारता येऊ नये यासाठी सर्व मजल्यांवर संरक्षक तारा बसवण्यात आल्या आहेत. पण तरीही हा प्रकार घडल्याने ही उपाययोजना अपुरी असल्याचे समोर आले.

logo
marathi.freepressjournal.in