
भाजपशी युती करण्याबाबत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आग्रही असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी त्यांचे फोनवरुन बोलणे झाल्यानंतर स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबईत येऊन भेटण्यास सांगितले आहे; पण शिंदे यांनी भाजपसोबत युतीची अट ठेवली असून याबाबत प्रथम आपली भूमिका स्पष्ट करा, असा आग्रह धरला आहे. तसेच भाजपसोबत युती झाली तर शिवसेना फुटणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. शिंदे यांनी ३५ आमदारांसह सुरत गाठले असून त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी अट शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना घातली आहे. त्यामुळे मविआ सरकारला मोठा हादरा बसला आहे.