मुंबई : शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभ्या राहतायत हे देशाच्या प्रगतीत फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने चांगले काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या, सिंचन क्षेत्रात काम करणारी गावे यांना एनएसईमध्ये आणल्याबद्दल संघाला मी धन्यवाद देत आहे असे प्रतिपादन नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी केले. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने एनएसईच्या डॉ. आर.एच.पाटील सभागृहात राज्यस्तरीय कृषी फलोत्पादन, सिंचन, इन्शुरन्स, मार्केटिंग, फुड परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.
शेतकऱ्याला आधारभूत ठरणारे प्रदर्शन महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आले. परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एन.बी.गोदरेज हे होते. गोदरेज उद्योग समुहामार्फत अद्ययावत प्रयोगशाळा उभारून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी खते, फलोत्पादनासाठी टॉनिकचे उत्पादन करण्यात येते व राज्यातील व देशातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी ती उत्पादने प्रभावी ठरत आहेत. म्हणून एन.बी. गोदरेज यांना यावेळी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गोदरेज उद्योग समुहाचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ (सिरकॉट) डॉ. सुजाता सक्सेना, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक अशोक कुमार पाठक, एफ एमसी इंडिया कॉर्पोरेशनचे संचालक राजु कपुर, इफको लि. चे महाव्यवस्थापक डॉ. एम एस पवार, आरपीएच कॉलेज ऑफ हॉस्पीटलीटी मॅनेजमेंट स्टडिजचे प्राचार्य योगेश उतेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान
राज्यात कृषी फलोत्पादनात उल्लेखनीय कार्य केलेल्या पृथाशक्ती एफपीसी अहमदनगर, कांचनी एफपीसी चंदपूर, अॅग्रिकार्ड एफपीसी सिंधुदुर्ग, राजापूर तालुका एफपीसी, कोकण बाग एफपीसी तर सिंचन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या कोनांबे, ता. सिन्नर, ग्रामविकासात भरिव काम करीत असलेल्या शिरखाल ठोंबरेवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, मराठवाडा विभागात परितक्त्या महिलांनी महीलांच्या सक्षमीकरणासाठी एकल महिला संघटनेच्या माध्यमांने विकासाभिमुख कार्य केल्याबद्दल एकल महिला संघटना, मक्याच्या प्रक्रिया उद्योगातून ९० महिलांना रोजागाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आळंदीच्या जयश्री साकोदे, फुड क्षेत्रात अभिनव प्रयोग करणाऱ्या पुणे येथील मृणाल फडके व दापोली येथील विणा खोत, तसेच नारंगी ता. अलिबाग येथील सोहम संतोष म्हात्रे यांजबरोबर विदर्भात कृषी पर्यटनाचा प्रकल्प राबविल्याबद्दल अमोल साठे व पवन साठे, बुलढाणा या सर्वांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.