आपली लढाई तीन पातळ्यांवर सुरू आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई कोर्टात सुरू आहे आणि तिसरी लढाईही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लढाई म्हणजे शपथपत्राची. शपथपत्रे गोळा करा, सदस्य नोंदणी करा, या लढाईत खंबीरपणे पाय रोवून उभे राहा, असे आवाहन शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. नागाला कितीही दूध पाजले तरी तो चावतोच, असा टोलाही त्यांनी लगावला.
जळगाव तसेच वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. “राजकारण म्हटले की, विजय-पराभव हा आलाच; पण आता तर संपविण्याची भाषा होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणतात की, शिवसेना संपत चालली आहे. त्यांना हे माहिती नाही की, शिवसेनेने अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवून आपला झेंडा रोवला आहे. आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण आता संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक बंड झाले. हे बंड थंड करण्याची ताकद माझयात आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
नागाला कितीही दूध पाजा तो चावतोच, असे म्हटले जाते. आपणही सर्वांना निष्ठेचे दूध पाजले; पण ते गद्दार निघाले. यांना गद्दार बोलताना बैलाचा उल्लेख करू नका. कारण बैलालाच त्रास होईल. जो काही सोक्षमोक्ष व्हायचा तो होऊन जाऊ द्या. विधानसभेच्या निवडणुका घ्या. मग दाखवून देऊ असे आव्हानही त्यांनी भाजप तसेच शिंदे गटाला दिले. जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला; पण त्यांना आता शिवसेनेचे काटे बघायचे आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.