

पालघर : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी १२ जणांवर मंगळवारी बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अजय चंदर अहाडी (१८) याच्यावर वांगर्जे शेंडेपाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
लाखनपाड्यात आज एकाच रांगेत १२ सरणं रचण्यात आली होती. एकाच कुटुंबातील आणि जवळच्या नातेवाईकांचे मृतदेह समोर पाहून गावकऱ्यांचा आक्रोश अनावर झाला. स्त्रियांच्या हंबरड्यांनी आणि नातेवाईकांच्या हुंदक्यांनी संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. बापूगावावर मंगळवारी स्मशानशांतता पसरली होती.
या अपघातात सुरेश लाखात, पांडू लाखात, काळू लाखात, सुनील दांडेकर, चिमा कुरहाडा, नमिता दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष सीताराम लाखात, सागर शेंडे, वंदना वळवी, सलोनी शिवराम वळवी आणि रियांक्षी संतोष लाखात सर्व राहणार बापूगाव आणि अजय चंदर अहाडी यांचा मृत्यू झाला. तर वेदांत हॉस्पिटलमध्ये १७ जण उपचार घेत असून त्यापैकी ६ जण अतिदक्षता विभागात असून ११ जणांची प्रकृती स्थिर आहे.
अंत्यसंस्कारावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांनी गावात जाऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.
निष्काळजीपणामुळे मृत्यूचा सापळा?
खडकीपाडा आणि मालपाडा या पाड्यांमध्ये मिळून सुमारे ७०० ते ८०० लोकसंख्या वास्तव्यास आहे. मात्र या भागात सुरक्षित सेवा रस्ता नाही. तसेच भरणी किंवा योग्य क्रॉसिंगची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना रोज जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो.