

नितीन बोंबाडे / पालघर
सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकांच्या मधोमध असलेल्या वाढीव बेट परिसरातील सुमारे चार हजार नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा सुरक्षित आणि कायमस्वरूपी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना रेल्वे पुलावरील रुळांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वेची सतत वर्दळ असलेल्या मार्गावरून हा जीवघेणा प्रवास वर्षानुवर्षे सुरू असूनही शासन आणि प्रशासनाकडून ठोस तोडगा निघालेला नाही.
वाढीव बेटातील नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग नसल्याने रेल्वे मार्गाचाच आधार घ्यावा लागतो. रेल्वे पुलावरून ये-जा करताना समोरून किंवा मागून रेल्वे येत असल्यास नागरिकांना बाजूला असलेल्या चौकीत थांबावे लागते. रेल्वे गेल्यानंतर पुन्हा रुळांवरून प्रवास सुरू करावा लागतो. दररोजचा हा प्रवास नागरिकांच्या जिवाशी खेळ ठरत आहे. ग्रामस्थांनी रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त पाहणी करून सुरक्षित पर्यायी मार्ग तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, वाढीव परिसरातील रेल्वे मार्गावर यापूर्वी अनेक नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे.
विद्यार्थ्यांचाही जीवघेणा प्रवास
वाढीव गावात केवळ पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे आठवीपासून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गावाबाहेर जावे लागते. मात्र सुरक्षित रस्ता नसल्याने शाळकरी मुला-मुलींनाही रेल्वे रुळांवरूनच प्रवास करावा लागतो. रेल्वेची वर्दळ, अरुंद मार्ग आणि संरक्षक व्यवस्था नसल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता कायम आहे.
वाढीव बेट परिसरातून वडोदरा एक्स्प्रेस-वे गेला आहे. मालवाहतूक रेल्वेसाठी पूल उभारण्यात आला असून, वसई-विरारला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइनही याच परिसरातून नेण्यात आली आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी मार्ग काढला जात असताना चार हजार नागरिकांना मुख्य रस्त्याशी जोडणारा सुरक्षित रस्ता देणे इतके कठीण का?
बेटी जाधव, रहिवासी