

मुंबई : जागतिक पार्किन्सन दिनानिमित्त या आजाराबद्दल केवळ एका दिवसापुरती जनजागृती न करता वर्षभर सातत्यपूर्ण प्रयत्न होणे गरजेचे असल्याचा सूर वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जगभरात १ कोटीहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त असून, त्याचे गांभीर्य ओळखून लवकर निदान आणि उपचारांच्या उपलब्धतेवर मज्जासंस्था तज्ज्ञ, मेंदू शल्यचिकित्सक आणि रुग्ण हक्क गटांनी भर दिला आहे. वेगाने वाढणारा हा आजार अजूनही मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित असून त्याबद्दल अनेक गैरसमज आहेत.
पार्किन्सन हा मध्यवर्ती मज्जासंस्थेचा एक जुनाट आणि प्रगतीशील विकार आहे. मेंदूतील डोपामाइन तयार करणाऱ्या पेशी हळूहळू नष्ट झाल्यामुळे हा आजार होतो, परिणामी रुग्णाला हालचाली आणि समन्वयामध्ये अडचणी येतात. साधारणपणे ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये हा आजार आढळत असला तरी, १० ते १५ टक्के रुग्ण ५० वर्षांखालील आहेत.
विश्रांतीच्या वेळी हातापायांना कंप सुटणे, हालचाली मंदावणे, स्नायू ताठ होणे आणि शरीराचा तोल जाणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत. अनेकदा ही लक्षणे वाढत्या वयाचा परिणाम असल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे निदानाला उशीर होतो. शारीरिक लक्षणांव्यतिरिक्त नैराश्य, चिंता, झोपेचे विकार आणि पचनाच्या समस्या यांसारख्या गैर-शारीरिक लक्षणांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ही लक्षणे अनेकदा मुख्य आजार सुरू होण्याच्या काही वर्षे आधी दिसू शकतात.