रेल्वेच्या प्रतिक्षालयातून प्रवाशांना सामानासह बाहेर हाकलले

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक तिकीट खिडक्या, सुरक्षा, उपहारगृह, प्रतिक्षालय टर्मिनल ठिकाणी उभारले आहेत
रेल्वेच्या प्रतिक्षालयातून प्रवाशांना सामानासह बाहेर हाकलले

लाखो प्रवाशांची ये-जा असणारे आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी लोकमान्य टिळक नगर टर्मिनल महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. याठिकाणी फ्लॅट क्रमांक ४च्या बाहेर असलेल्या जुन्या प्रतिक्षालयात गाड्यांची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना जीआरपी पोलिसांनी हाकलवून लावल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या ११ च्या सुमारास घडली. यांनतर रेल्वे प्रवासी संघटनांनी याबाबत विचारले असता त्याठिकाणी प्रतिक्षालयच नसल्याचे गजब उत्तर जीआरपीने ट्विटद्वारे दिले आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी प्रतिक्षालय असताना त्यांना रात्रीच्या वेळेस आपल्या सामानासह बाहेर काढण्यामागचे नेमके कारण जीआरपीने तसेच रेल्वे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.

लोकमान्य टिळक नगर टर्मिनल स्थानकात प्रतिदिन लाखो प्रवासी ये-जा करतात. या स्थानकातील बाजूलाच असलेल्या टर्मिनल मधून लांब पल्ल्यांच्या गाड्या सुटतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून आवश्यक तिकीट खिडक्या, सुरक्षा, उपहारगृह, प्रतिक्षालय टर्मिनल ठिकाणी उभारले आहेत. फलाट क्रमांक ४ च्या बाहेर जुने प्रतिक्षालय आहे. त्याठिकाणी अवतीभवती जीआरपी पोलीस चौकी, तिकीट खिडक्या, शौचालय इत्यादी सोयीसुविधा आहेत. प्रवासी अथवा प्रवाशांचे नातेवाईक फलाट तिकीट काढत गाडीच्या वेळेआधी याठिकाणी पोहोचतात. टर्मिनल ठिकाणी असलेल्या प्रतिक्षालयात आराम करणे, सामान सुरक्षित ठेवणे, मोबाईल चार्जिंग करणे आदी सुविधांचा लाभ घेतात. मात्र मागील काही दिवसांपासून सुरक्षेचा प्रश्न निर्माण करून जीआरपीकडून प्रवाशांना न सांगता प्रतिक्षालयातून जबरदस्ती बाहेर काढण्यात येत असल्याचा आरोप रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in