
मुंबई : म्हाडाच्या दडपशाहीविरोधत पत्राचाळ रहिवाशांनी मंगळवारी आक्रोश मोर्चा काढून म्हाडा कार्यालयावर धडक दिली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या. यावेळी जयस्वाल यांनी मागण्या मान्य करीत असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
मंगळवारी झालेल्या आक्रोश मोर्चात जवळ जवळ ३०० सभासद आले होते. दुपारी १.३० च्या दरम्यान पत्राचाळीचे परेश चव्हाण, पद्मनाभ नायडू, संजय चांदोरकर, रेखा नाईक, मकरंद परब, राजेश्वर शिंदे, राजेश दळवी, शशांक रामाणे व सुरेश विचारे अशा ९ जणांच्या शिष्टमंडळाने उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी मिलिंद बोरीकर, लीगल टीम व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांमध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश होता. विकास करार व वैयक्तिक कराराचा मसुदा मंजूर करून संस्थेला पाठविण्यात येईल. त्यानंतर मसुदा नोंदणीकृत होईल. व्हिजेटीआय अहवाल आल्यानंतर तांत्रिक बाबी तपासण्यात येतील व बांधकाम राहण्यास योग्य असेल तेव्हाच सदनिकेचा ताबा देण्यात येईल. डिफेक्ट लियाबिलिटी ५ वर्षांची करण्यात आली.
याबरोबरच, २५ करोड कॉर्पस फंडवर व्याज न देता प्रकल्पातील ६६३ सभासदांव्यतिरिक्त उरलेल्या २३ सदनिका संस्थेला रीतसर देण्यात येतील. तसेच त्याचा उल्लेख विकास करारात करण्यात येईल. ताबा दिल्यानंतर शिफ्टिंग साठी १ महिन्याचे भाडे अतिरिक्त देण्यात येईल. प्रकल्पाला कंपाऊंड वॉल व बोरिंग करण्यात येईल. पुरातन अंबामाता मंदिराची म्हाडा पुनर्बांधणी करून देईल आदी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.